लक्ष्मीच्या पूजेमध्ये काही वस्तू असणे आवश्यक आहे कारण या वस्तूंमुळे
महालक्ष्मी प्रसन्न होते. या वस्तूंमुळे घरामध्ये सुख-समृद्धी येते.
तोरण- आंब्याच्या पानांचे तोरण मुख्य दरवाजाला बांधावे. कारण या
पानांच्या सुगंधाने देवगण आकर्षित होतात आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करतात.
असे मानले जाते की, दिवाळीचे तोरण महिनाभर तसेच दरवाजाला बांधून ठेवले, तर
घरामध्ये एकता आणि शांती कायम राहते.
स्वस्तिक - सर्वजण प्रत्येक अनुष्ठानापुर्वी स्वस्तिक चिन्ह काढतात.
पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर दिशा दाखवणाऱ्या स्वस्तिक चिन्हाच्या चार
भुजा ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि सन्यास आश्रमांच्या प्रतिक
मानल्या गेल्या आहेत. हे चिन्ह केशर, हळद किंवा कुंकुवाने काढतात.
कवडी - लक्ष्मी पूजनाच्या सामग्रीमध्ये कवडी ठेवण्याची प्राचीन
परंपरा आहे, कारण ही धन आणि 'श्री'चा पर्याय आहे. कवडी तीजोरीत ठेवल्याने
सदैव लक्ष्मीची कृपा राहते.
बत्ताशे किंवा गुळ - लक्ष्मी पूजनानंतर बत्ताशे किंवा गुळ दान केल्याने धनामध्ये वृद्धी होते
ऊस - लक्ष्मीचे एक वाहन हत्ती आहे. हत्तीचे प्रिय खाद्य ऊस आहे.
दिवाळीच्या दिवशी पूजेमध्ये ऊस ठेवल्यास ऐरावत प्रसन्न होतात आणि त्यांच्या
शक्ती आणि वाणीचा गोडवा घरामध्ये कायम राहतो.
ज्वारीचे कणीस - दिवाळीच्या दिवशी ज्वारीचे कणीस घरामध्ये ठेवल्याने
धनामध्ये वृद्धी होते. वर्षभर धन-धान्याची कमतरता राहत नाही. लक्ष्मी
पुजनामध्ये ज्वारीचे कणीस ठेवल्यास घरामध्ये लक्ष्मी निवास करते.
रांगोळी - लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी तसेच मुख्य दारासोमार रांगोळी
काढावी. कमळ, स्वस्तिक, कलश या चिन्हाची रांगोळी काढावी. असे म्हणतात की,
लक्ष्मी रांगोळीकडे लवकर आकर्षित होते.
बलिप्रतिपदेमागील आख्यायिका आणि पाडव्याची परंपरा
बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा हा कार्तिक मासाचा प्रथम दिवस. विक्रम
संवत याच दिवशी सुरू होतो. व्यापारी वर्षारंभाचा हा दिन. बलिप्रतिपदा हे
नाव ‘बळी’ नामक असुराच्या स्मरणार्थ दिले आहे. बळी हा असुरांचा राजा, पण तो
धार्मिक, दानशूर, प्रजाहितदक्ष शासक होता. राजा बळीच्या शासनव्यवस्थेत
प्रजा सुखी, समाधानी होती.
fब्रह्मदेव-त्याचा पुत्र मरिची-कश्यप-हिरण्यकशिपू-प्रल्हाद-विरोचन-बळी
अशी याची वंशपरंपरा पुराणांत-महाभारतात आढळते. बळीचे गुरू शुक्राचार्य.
त्यांच्या आशीर्वादाने हा सर्वथा बलाढ्य झाला होता, असे वर्णन पुराणात
आढळते. (भागवतपुराण 8 स्कंध). दैत्य असला तरी बळीराजा सदाचारसंपन्न, न्यायी
आणि उदार होता. त्याने स्वर्गावर आक्रमण करावे, असे शुक्राचार्यांच्या
सल्ल्याने ठरवले. तेव्हा इंद्राने आपले गुरू बृहस्पती यांच्या
सल्ल्याप्रमाणे देवांसह पलायन केले. युद्ध न करताच बळीला स्वर्गाचे राज्य
मिळाले, परंतु त्याचे समाधान झाले नाही. त्याने गुरूच्या सहकार्याने
पृथ्वीवरही राज्य करायला प्रारंभ केला. तो न्यायी होता, तरी काही जणांच्या
अधिकारावर त्याचे अतिक्रमण झाले होते. ईश्वरीय व्यवस्थेविरुद्ध केलेली
बंडखोरी होती.
देवमाता अदिती आपले पुत्र परागंदा झाल्यामुळे व्याकुळली होती. तिचे
पती महर्षी कश्यप यांनी अदितीच्या विनंतीवरून तिला एक व्रत करायला
सांगितले. ते तिने श्रद्धेने आचरिले. भगवान विष्णूने प्रसन्न होऊन तिच्या
पोटी अवतार धारण केला. तोच वामन. वामनाने तिला सुचवले- बळीराजा लोकप्रिय,
न्यायी राजा असल्याने त्याच्याशी युद्ध करून नव्हे, युक्तीने देवांचे राज्य
आपण मिळवून देऊ.
कश्यपाने वामनाची मुंज करून मेखला (करदोडा), कौपीन (लंगोटी),
यज्ञोपवीत (जानवे), दंड (काठी), छत्र (छत्री), भिक्षापात्र (झोळी) अशा
सामग्रीने त्याला बटुरूपात सजवले.
हा दिव्य बटू ‘भिक्षां देहि’ करत बळीकडे निघाला. बळी राजा त्या वेळी
नर्मदा सागर संगमापाशी भृगुकच्छ (भडोच किंवा भरुच-गुजरात) क्षेत्री मोठा
यज्ञ करत होता. वामन तिथे पोहोचला, बळीने त्याचे स्नेहादरपूर्वक स्वागत
केले आणि वाटेल ते दान देण्याची सिद्धता दर्शवली. जीवनात कुणाकडेही हात
पसरावा लागणार नाही, एवढे दान तो देऊ करत होता; परंतु वामनाने अतिमधुर
वाणीने त्याच्या पराक्रमी पूर्वजांची प्रशंसा करत केवळ तीन पावले भूमी
मागितली. आपण अल्पसंतुष्ट असून एवढ्याच भिक्षेने आपल्याला समाधान आहे, असे
नम्रपणे सांगितले. ‘वांछात:प्रतिगृह्यतां’ असे म्हणून बळीने संकल्प सोडायचा
विचार केला; पण दैत्यगुरू शुक्राने वामनाचा डाव ओळखला. त्याने बळीला सावध
केले. हा कोण आहे, हे सांगितले. हा ‘मायामाण वको हरि:’ ‘‘हा ‘कपटवेषात
साक्षात विष्णू’ असून तो तुला लुबाडील’’ असा इशारा दिला. पण दानशूर बळीने
दान दिलेच. त्या क्षणी वामनाने विशाल-विराट रूप घेऊन दोन पावलात बळीचे
स्वर्ग आणि पृथ्वी येथील सर्व राज्य व्यापले आणि तिसरे पाऊल कुठे ठेवू असे
विचारले. तेव्हा सत्यवादी बळीने आपले मस्तक पुढे करून दान पूर्ण करून
घेण्याची विनंती केली.
हा सर्व प्रसंग घडला तो दिवस कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा. म्हणून हा दिवस बलिप्रतिपदा या नावाने प्रसिद्ध झाला.
आपल्या मराठी महिन्यात पंचांग योगाने काही तिथी, नक्षत्र, दिवस हे
शुभफलदायी व सर्व कामांकरिता अतिउत्तम मुहूर्त म्हणून शास्त्राधाराने
अधोरेखित केलेले आहेत. हे दिवस वेगवेगळ्या सणांच्या आणि संस्कारांच्या
चौकटीत पूर्वापार प्रथा-परंपरेप्रमाणे आपण साजरे करतो. यामागे धर्म, अर्थ,
पुराणकथा, आहार, निसर्ग ऋण, या सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या
दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात.
लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा
प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन
वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू
करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या
दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून मुलगी आपल्या वडलांना आणि
पत्नी आपल्या पतीला ओवाळते ते त्यांचे सुख, समाधान, यश अक्षय राहो, वाढत
राहो म्हणून.
हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असून या दिवशी कार्याचा शुभारंभ,
सुवर्णखरेदी याला विशेष महत्त्व आहे. पत्नी पतीला औक्षण करते व पती
पत्नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी
साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयांस आहेर
करतात.
दीपावली पर्वातील कार्तिक शुक्ल द्वितीया हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा कला जातो. या सणाची आख्यायिका पुढीलप्रमाणे आहे...
सूर्यपत्नी संज्ञा हिला दोन मुले होती - मुलगा यमराज आणि मुलगी यमुना.
पती सूर्याचे तीव्र किरण सहन न होऊन संज्ञा ही उत्तर ध्रव येथे छाया बनून
राहू लागली. तिच्यापासून ताप्ती नदी किंवा शनीश्वराचा जन्म झाला. याच
छायेपासून सदा युवा राहणा-या अश्विनीकुमारचाही जन्म झाला. अश्विनीकुमार हे
पुढे देवांचे वैद्य बनले. उत्तर ध्रुवाच्या ठिकाणी वास्तव्यास गेल्याने
संज्ञा उर्फ छाया हिचे यम आणि यमुनेशी असलेल्या संबंधात अंतर पडले. याने
व्यथित होऊन यमराजाने यमपुरी वसवली. आपला भाऊ यमपुरीत पापी लोकांना दंडित
करतो, हे यमुनेला सहन झाले नाही. ती दु:खी होऊन गोलोकात निघून गेली.
खूप वर्षानंतर यमाला अचानक एके दिवशी आपल्या बहिणीची आठवण झाली. यमाने
आपल्या दूतांकडून बहिणीचा शोध घेतला. पण बहिणी कोठेच आठळली नाही. मग यम
स्वत: बहिणीच्या शोधात निघाला. गोलोकात आल्यानंतर त्याला बहिणीची भेट झाली.
इतक्या वर्षानंतर भाऊ भेटल्याने बहिणीला खूप आनंद झाला. तिने भावाचे
स्वागत केले. स्वादिष्ट भोजन करून खाऊ घातले. याने प्रसन्न होऊन यमाने
बहिणीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा यमुना म्हणाली, 'हे दादा, माझ्या
जलात जो कोणी स्रान करेल त्याला यमपुरीत यावे लागू नये, असे मला वाटते.'
हे ऐकून यम चिंतित झाला. या वरदानाने यमपुरीचे अस्तित्व धोक्यात येईल
असे यमराजास वाटू लागले. भावाला चिंतित पाहून यमुना म्हणाली, 'दादा चिंता
करू नको. तू असे वरदान दे की या दिवशी जो भाऊ बहिणीच्या घरी जेवण करेल
किंवा मथुरा येथील विश्रामघाटावर स्रान करेल त्याला यमपुरीत यावे लागू
नये.' यमराजाने याला स्वीकृती दिली. तेव्हापासून भाऊबीजेच्या सणाला सुरूवात
झाली.
Diwali Greeting card in Marathi jokes
